Saturday, 9 July 2016

निमित्त आंबेडकर भवन!

सपा आणि बामसेफच्या विचाराच्या मुशीत तथाकथित `महानायकां’चा पिंड पोसला गेला आहे. बसपा आणि बामसेफ कोणाच्या तालावर नाचते हे सर्वश्रुत आहेच. त्यामुळे महानायकांची मांडणी आणि लिखाण त्याच त्याच तर्कटातून होत असते. तीस वर्ष आदळ आपट केल्यानंतरही महाराष्ट्रातील लोक बसपा आणि बामसेफला स्वीकारत नसल्याने ही सर्व फ्रस्टेड उठाठेव आहे. त्यामुळे आधी दलित नेत्यांवर गटबाजीचे खापर फोडून त्यांची हेटाळणी करण्यात आली. दलित नेत्यांना नालायक ठरवून चमचा युगाचे वाहक बनविण्यात आले. आता गवई, टीएम., ढसाळ आपल्यात नाहीत. आठवले आणि कवाडे भाजपा आणि काँग्रेसचे आश्रित झाले आहेत. त्यामुळे आंबेडकरी चळवळ प्रकाश आंबेडकरांच्या हातात जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने ही चळवळच माओवाद्यांच्या ताब्यात जात असल्याची थिअरी मांडण्याचा खटाटोप केला जात आहे. ही चळवळ बसपा आणि पर्यायाने संघाच्या दावणीला बांधण्याचा त्यामागचा सुप्त हेतू आहे. खरे तर ही मांडणी करणारे ज्या गृहखात्यात कामाला होते, त्याच गृहखात्याचे मंत्री असलेल्या आरआर आबांची ही 'राष्ट्रवादी थिअरी' होती. तिच्या पालखीचे भोई होण्याचे काम आता जोरकसपणे सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आंबेडकरी चळवळ ज्या पॉइंटला स्ट्राँग होऊ शकते त्याच पॉइंटला ही थिअरी मांडल्या जाते हे विशेष. ऐनकेन प्रकारे महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळ नेस्तनाबूत करून ती कुण्या उत्तर प्रदेशातील पक्षाच्या माध्यमातून रेशीमबागेच्या दावणीला बांधण्याचा यामागचा खटाटोप तर नाही ना? अशी शंका घेण्याला वाव आहे. विशेष म्हणजे ही आंबेडकरद्रोही (आंबेडकर भवन पाडणारे आणि त्याचे समर्थन करणारे सुद्धा) भूमिका मांडणारे `रेशीमबागे’च्या प्रांतातीलच आहेत. हे खेदाने नमूद करावे लागते.



बाबासाहेबांचे हे १२५ वे जयंती वर्ष. जगभरात जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना काही नतद्रष्ट पढे-लिखे लोकांनी बाबासाहेबांच्या पदस्पर्श लागलेल्या आणि त्यांच्या ऐतिहासिक कामांची साक्षीदार असलेल्या आंबेडकर भवनाला नेस्तनाबूत करण्याचा करंटेपणा केला. आंबेडकर भवन पाडल्याचे समर्थन करताना कोण आनंद झाला अशा अर्विभावात समर्थन केले जात आहे. हेच लोक काल परवापर्यंत मायावतींनी उत्तरप्रदेशात उभारलेल्या स्मारके आणि पुतळयाचे (त्यात मायावतीचा स्वतः पुतळा आला बरं का) समर्थन करत होते. इकडे मात्र आंबेडकर भवन पाडल्याचे समर्थन करत आहेत. या दुटप्पी भुमिकेमुळे त्यांचा इथल्या आंबेडकरी चळवळीबाबतचा द्वेषच त्यातून अधोरेखित होत नाही का? सतरा मजली टॉवरचे समर्थन करणारे नवी मुंबईतील ट्रस्टच्या भूखंडाचा गैरवापर का केलात? असा सवाल रत्नाकर गायकवाड आणि ट्रस्टला करताना दिसत नाहीत. बाबासाहेबांनी राजगृह वगळता सर्व प्रॉपर्टी समाजाच्या नावे केली होती. समाजाच्या नावे प्रॉपर्टी करण्याचा हा बाबासाहेबांचाच वारसा आहे, असं सांगणारे गायकवाड स्वत:ची प्रॉपर्टी समाजाच्या नावे करण्याचे बाबासाहेबांचे धोरण का राबवित नाहीत? असा सवालही या उपटसुंभांकडुन केला जात नाही. अरे,बाबासाहेब रिटायरमेंटनंतर चळवळ आणि समाजसेवेकडे वळले नव्हते, हे या दीड शहाण्यांनी लक्षात ठेवावं. या पढे-लिखे लोकांचे कान उपटण्याचे काम आंबेडकरी वृत्तपत्रांनी करायला हवे होते पण त्याऐवजी हे लोक गायकवाड सारख्या अधिकाऱ्यांचे समर्थन करताना दिसत आहेत. खरे तर सम्राट आणि लोकनायक येताच रिपब्लिकन चळवळ मजबूत होण्याची चिन्हे दिसल्याने केवळ आणि केवळ बसपा आणि बामसेफची भूमिका मांडण्यासाठीच वर्तमानपत्र काढणाऱ्या रेशीमबागेतील भूमिपुत्रांकडुन काय अपेक्षा करायची म्हणा?



विदर्भ म्हणजे नाग लोकांची भूमी. याच विदर्भातील भंडाऱ्यात बाबासाहेबांचा पराभव करण्यात आला. तरीही या नागभूमीत बाबासाहेबांनी धम्मक्रांती केली. याच भूमीत रेशीमबाग आणि सेवाग्राम आहे. प्रतिक्रांती करणाऱ्यांच्या बालेकिल्ल्यात बाबासाहेबांनी ऐतिहासिक क्रांती घडवून आणली. पण आंबेडकर स्मारक पाडणाऱ्या ट्रस्टीमधील उत्तमराव बोदवडे आणि डॉ.अभय बांबोले हे विदर्भातलेच आणि त्यांच्या कृतीचे समर्थन करणारे सुद्धा याच भूमीतले हा निव्वळ योगायोग कसा असू शकतो? (आता प्रांतवाद करून आंबेडकरी चळवळ फोडण्याचे हे षडयंत्र असल्याचा काही लोक युक्तीवाद करतील. काही लोक म्हणण्यापेक्षा भवन पाडणारे आणि त्याचे समर्थन करणारेच नकट्या नाकाने युक्तीवाद करतील) या भूमीत बाबासाहेबांनी धम्मक्रांती केली. या भूमीत सूर्यफूले फूलतील अशी अपेक्षा केली. त्याच भूमीत अस्तनीतील साप निपजावेत याच्या सारखी क्लेशदायक घटना दुसरी असू शकते काय?